मान्सून तीन दिवसांत अंदमानात?   

पुणे : यंदा नैऋत्य मोसमी वाटचालीला (मान्सून) पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावेळी मान्सून वेळेआधीच अंदमातान दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. बुधवारपर्यंत मान्सून दक्षिण अंदमानात थंडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अंदमाना पाठोपाठ देवभूमी केरळमध्येही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत. 
 
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे १९ ते २० मे च्या दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर सुमारे १ जूनला तो केरळात दाखल होतो. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळा निर्माण न झाल्यास सुमारे ५ ते ७ जून च्या दरम्यान तो तळ कोकणात दाखल होतो. त्यानंतर १० ते १२ जूनच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापत असतो. मात्र यंदा १३ ते १४ मे दरम्यान मान्सून अंदमानात, तर २० ते २२ मे दरम्यान तो केरळात दाखल होणार आहे. सुमारे १ जूनच्या आसपास तो तळकोकणात दाखल होऊ शकतो. असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 
 
याआधीच्या अंदाज राज्यात १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे तपमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यात मान्सून वेळेआधीच प्रवास सुरू करणार असल्याची आनंदवार्ता आल्याने शेतकर्‍यांसह देशवाशियांच्या मनात आनंदाच्या भावना आहेत. 

राज्यात अवकाळी पाऊस कायम

राज्यातील विविध भागात आणखी तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस कायम असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील २४ तासात विदर्भात काही ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तपमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात काल अमरावती येथे उच्चांकी ४१.४ अंश कमाल तपमानाची नोंद झाली आहे.

मान्सूनसाठी पोषक घटक

यंदाच्या कडक ऊन्हाळ्यामुळे जमिन अधिक तापली होती. त्याचाच परिणाम म्हणून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. तसेच समुद्राचे तपमान जमिनीच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे अधिक प्रमाणात बाष्प तयार होत गेले. त्याचे रूपांतर अवकाळी पावसात झाले. सद्य:स्थितीत वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहेत. समुद्रातील बाष्प जमिनीकडे येत आहे. हे मान्सूनच्या आगमनाची लक्षणे आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून यंदा मान्सून वेळेआधीच अंदमानात दाखल होणार आहे.  
 

Related Articles